सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर मनपाच्या नगसेवकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सोलापूर महानगर पालिकेमध्य भाजपचे नगरसेवक संख्याबळ एकाने कमी झाले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग ११मधील नगरसेविका अनिता मगर यांचे पद मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. मगर यांना तीन अपत्ये असून तिसरे अपत्य १२ सप्टेंबर २०११ नंतर झाल्याचे कारण देत हा निकाल दिल्याचे अॅड. अजित आळंगे यांनी सांगितले.
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून पराभूत झालेल्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी मगर यांना तीन अपत्ये असून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी कोर्टात केली होती. निवडणुकीसाठी मगर यांनी तिसरे अपत्य त्यांचे नसून सुनीता आणि दत्तात्रेय मगर यांचे असल्याचे भासवून जन्म दाखल्यावर २०११ रोजी दुरुस्त करुन आई- वडिलांचे नाव बदलल्याचेही त्यांचे म्हणणे होते.
मात्र, मूळ दाखल्यावर अनिता मगर याच त्यांच्या आई असल्याची नोंद आहे. मगर यांनी तिसरे अपत्य त्यांचे नसल्याबाबत सबळ पुरावा न्यायालयात सादर केला नाही. अन्य मुद्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने मगर यांची याचिका फेटाळून लावली. तर त्यांचे पद रद्द करण्याचा आदेश कायम ठेवला. मगर यांच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. मात्र अखेर कोर्टाने भाग्यलक्ष्मी म्हंता यांच्या बाजूने निकाल दिला होता.