ग्लोबल न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्यांच्या बांधावर गेले होते. तेव्हा 50 हजारी हेक्टरी देऊ अस म्हटलं होते. मात्र 8 हजार दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की बागायत शेतकर्यांना दीड लाख रुपये देऊ असे सांगितले. आम्ही 42 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली होती.
परंतु महाविकास आघाडी सरकारने फक्त 29 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली आहे. पण पुढे काय झालं एवढच सांगतो. ‘राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला.
प्रामाणिक शेतकर्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. मांजरी बुद्रुक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा आयोजित केली होती.
त्यामध्ये भाषण करताना फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे क्रांतीकारी आहेत. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालाचा अन् शेतीचा खरा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत. केंद्र आणि राजाच्या कृषी कायद्यात फरक आहे. नव्या कायद्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व अबाधित आहे.
केंद्राचे तीनही कृषी कायदे क्रांतीकारी असून कंत्राटी शेतीमध्ये काही वाद झाले तर शेतकरी कोर्टात जाऊ शकतो पण व्यापारी जाऊ शकणार नाही. तसेच बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित आहे. परंतु शेतकऱ्याला त्याचा शेतमाल कुठेही विकण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य असणार आहे. शेतकऱ्यांना संरक्षण देणारे हे कायदे आहेत. मोदी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि कायम राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.