मुंबई : मध्य महाराष्ट्राच्या परिसरात पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील. अनेकअसे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
पावसाचा बसला मोठा फटका
औरंगाबादमध्ये रात्री मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक भागांत ढगफुटी सारखा पाऊस झाला. पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. शहरातील काही भागात आणि शहराजवळील नारेगाव पळशी भागातही पाणी साचले आहे. ओढे ओसंडून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी दुकानात पाणी शिरले आहे. सोयगाव, सिल्लोड ,खुलताबाद ,फुलंब्री ,औरंगाबाद तालुक्यात या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
वीरभद्रा नदीला आला पूर
नांदर येथील वीरभद्रा नदीला रात्री झालेल्या जबरदस्त पावसामुळे पूर आला आहे. गावात येण्यासाठी असलेले दोन्ही पूल पाण्याखाली गेले. पुरामुळे गावात वेशीपर्यंत पाणी आले होते. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अजूनही पूरस्थिती कायम आहे.
बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी
बीड जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आलाय. पाटोदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसान धुमाकूळ घातलाय. शेतात पाणी घुसलंय. नदी नाले वाहात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तालुक्यात अनपटवाडी इथे नदीवर पूल नसल्यामुळे पलीकडच्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पोहून नदी पार करावी लागतेय. पावसामुळं शेतकऱ्यांना संकटांना समोर जावं लागतंय.
वाशिम जिल्ह्याला गारपिटीचा बसला तडाखा
वाशिम जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी, चेहल, धानोरा, दाभा आणि लावना इथं पावसासह गारपीट झालीये. गारपिटी मुळे सगळी पिके भुईसपाट झाली आहेत. फळबागांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
परभणी जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले
शुक्रवारी संध्याकाळी परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्री दोन तास पावसानं शहराला झोडपलं. दोन तासांटच पावसानं रस्ते, नाल्या तात्काळ जलमय झाले.गोंदिया जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर पहाटेपासून पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.