मुंबई : मुंबई पाठोपाठ राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने कमी होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत झालेली आहे. तसेच सोमवारी आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे दिलासादायक चित्र आहे. मात्र, करोनाच्या संकटात सुद्धा यश घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या आघाडी सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट सवाल केला आहे.
आज मुंबईतील परिस्थितीही नियंत्रणात आलेली असून, मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. सर्वोच्च न्यायालय ते थेट देश-विदेशातील विविध वृत्तपत्रांनी मुंबई मनपाचे कौतुक केले आहे. मात्र मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट करून काही प्रश्न उपस्थित केले आहे.
या ट्विटमध्ये करोना परिस्थितीवरून देशपांडे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.