गडचिरोली | पोलिसांच्या C-60 कमांडो पथकाने धडकेबाज कारवाई करत एकाच वेळी २७ माओवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईनंतर सर्व स्थरातून कौतुक करण्यात आले होते. मात्र आता माओवाद्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता डोके वर काढले आहे. माओवाद्यांनी सहा राज्यात बंद पुकारला आहे.
तसेच मिलिंद तेलतुंबडे आपल्या चळवळीत सक्रीय होते, अशी कबुलीही माओवाद्यांनी दिली. १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या ग्यारापत्तीच्या जंगलात सी-60 कमांडोच्या पथकांनी २७ माओवाद्यांचा खात्मा केला होता. आता या २७ माओवाद्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी सहा राज्यात बंदचे आवाहन केले आहे.
माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने याबद्दल पत्रक जारी केले आहे. तसंच, मृतक माओवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे माओवाद्यांनी इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, मिलींद तेलतुंबडे १९९२ पासून माओवादी चळवळीत सक्रिय असल्याची कबुलीच माओवाद्यांनी दिली आहे. या पत्रकातून मिलींद तेलतुंबडेसह इतर माओवादी नेत्यांचा उल्लेख करत संघटनेकडून श्रद्धांजली अर्पण करत कुटूंबियाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.