ग्लोबल न्यूज: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील परिस्थिती ही गंभीर होत असलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंध लादले आहेत. याचा अनेकांकडून विरोध केला जात आहे. आता याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. यामुळे जनतेने राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्वांचे सहकार्य अपेक्षित
शरद पवार लाइव्ह येत म्हणाले की, ‘राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची रोजची आकडेवारी 50 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. व्यापरी वर्गाकडून या निर्बंधांना मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. मात्र जनतेच्या जीवाच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे आवाहन शरद पवारांनी केले.’
केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे
पवार म्हणाले की, ‘राज्यातील वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र झटत असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध करावे लागेल, याला दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारनेही हेच म्हटले आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन जाधव यांच्याशी मी संपर्क साधला. त्यावेळी संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे केंद्राने सांगितले’ असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल
नव्या निर्बंधांसंदर्भात दुकानदार, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याविषयी बोलताना पवार म्हणाले की, ‘नाशवंत भाजीपाल्याचे काय करायचे असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारी वर्गासमोर आहे याचीही जाणीव आपल्याला आहे. मात्र सध्या घेतलेला निर्णय आणि निवडलेला मार्ग हा यशाचा मार्ग करायचा असेल तर या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल, याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही’ असे पवार म्हणाले. वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही याची जाणीव सामाजातील सर्व घटकांनी ठेवणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.