नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत्या रुग्ण्यसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणामुळे केंद्र सरकारची संपूर्ण देशात नाही तर जगभरात नाचक्की झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या मृत्यूंना केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
“मी पुराव्यांच्या सहाय्यानं बोलत आहे. जेव्हा सर्व डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी सांगितलं होतं की कोरोनाची दुसरी लाट येणार, त्यावेळी योग्य त्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला ऐकला नाही आणि आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले. कोरोनाच्या विरोधात रोडमॅप तयार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. ८ एप्रिल रोजी त्यांनी आपण कोरोनाविरोधात लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. भाजपनं प्रस्ताव पारित करत पंतप्रधानांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या सर्वांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे असं ओवेसी म्हणाले.
एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. “क्रिकेटच्या मैदानावर पंतप्रधानांनी आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्या देशांना देण्यासाठी आपण लसींची व्यवस्था केली. परंतु वेळे असतानाही आपण सतर्क झालो नाही आणि लसींची निर्यात सुरू ठेवली. ऑक्सिजनसाठीही पंतप्रधान आणि त्यांचं सरकारच जबाबदार आहे असं ते म्हणाले.
ऑक्सिजनची जबाबदारी ही पंतप्रधानांवर आहे. ऑक्सिजनसाठी उच्च न्यायालयात जावं लागलं. पंतप्रधानांची अकार्यक्षमता मोदींचे भक्त प्रशासनावर ढकलत आहे. ना लसीची ऑर्डर दिली, ना आगाऊ रक्कम दिली. तुम्ही आगाऊ रक्कम मार्च महिन्यापासून दिली. एक प्रकारे तुम्हीच दुसऱ्या लाटेला दावत दिली. साडेचार महिन्यांत देशाच्या लोकसंख्येतील केवळ ३.२ कोटी लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आणि १६ कोटी लोकांना एक डोस मिळाला. अशात तिसरी लाट आली तर काय होईल?” असा सवाल करत ओवेसी यांनी सरकावर निशाणा साधला.