“मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं” पुन्हा राऊतांचा मोदी सरकारला जोरदार टोला

 

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातले २२ तास जागे असतात. ते केवळ २ तास झोपतात. सध्या नरेंद्र मोदी एक प्रयोग करत असून तो म्हणजे त्यांना झोपावं लागणार नाही, असे वक्तव्य केले. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोखच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं, असा खोचक टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

राऊत म्हणाले आहेत की,’मालिक तो महान है, बस चमचों से परेशान हैं सध्या आपल्या देशात हेच वातावरण दिसत आहे. देशातील राजकारणात सरळ दोन गट पडले आहेत. भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत. भांड, भाट आणि चमचे ज्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सामील केले जातात ते राज्य रसातळाला जाते व राजा विश्वास गमावून बसतो.

पुढे ते म्हणत्यात की, आज आपले पंतप्रधान मोदी अशाच चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेस काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झाले. काम तेच. देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. आज मोदी भक्तांनी ‘मोदी इज इंडिया’ असे जाहीर केले. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत असे टोक भक्तांनी गाठले, पण आता कडेलोट केलाय तो महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी असे विधान त्यांनी केले होते.

पुढे ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे.’

Team Global News Marathi: