नवी दिल्ली | काँग्रेसमुक्त विरोधी पक्षांची मोट बांधण्यात गुंतलेल्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यावरून विरोधकांमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधून यात भर टाकण्याचे काम केले आहे. उत्तर प्रदेशात निवडणुका होत नाहीत तोपर्यंतच समाजवादी पार्टी ममतांच्या पाठीशी उभी राहू शकते; तर दुसरीकडे काँग्रेस विरोधी पक्षांना आपल्या बाजूने आणण्यासाठी सक्रिय बनली आहे. डीएमके, डावे पक्ष, आरएसपी, एनसीपी, आरएसपीसह इतर अनेक पक्ष सध्या तरी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या ऐक्याच्या बाजूने आहेत.
आरएसपीचे खा. एन. के. प्रेमचंदन यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर कोणतीच स्पष्टता नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सोनिया गांधी यांच्याकडे उत्तम राजकीय विचार आहे, तसेच संघटनात्मक क्षमता आहे. मात्र, काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय क्षमतांचा वापर केला जात नाही. तसे झाले तर काँग्रेस मजबूत स्थितीमध्ये येईल व विरोधकांच्या नेतृत्वाबाबत कोणताच प्रश्न उरणार नाही.
डाव्या पक्षांच्या एका खासदाराने माध्यमांशी खास बातचित करताना सांगितले की, विरोधकांचे ऐक्य तोडण्याचे सर्वांत मोठे षड्यंत्रकारी प्रशांत किशोर आहेत. त्यांच्याकडे हे काम मोदी-शाह या जोडीने सोपविले आहे. ते भाजपच्या एजंटच्या रूपात काम करीत आहेत, असा आरोपही केला.