नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास दोन तास मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याच चर्चा झाली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, जीएसटी, मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागा अशा प्रमुख मागण्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान मोदींनी आमच्या मागणी ऐकून घेतल्या, त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राचं शिष्टमंडळ मोदींना भेटल्यानंतर, दिल्लीतील महाराष्ट्र भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी आपआपले मुद्दे मांडले. यावेळी अजित पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात आम्ही मोदींकडे विविध मुद्दे मांडले. यामध्ये मराठा आरक्षणचा मुद्दा, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण काढलं, त्याचा परिणाम शंभरपेक्षा अधिक जागांवर झाल्याचं सांगितलं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत चर्चा झाली , कारण २०२१ च्या जनगणेनंन हा मुद्दा निकालात येऊ शकेल, इतर राज्यातही त्याचा परिणाम झाला आहे असं मोदींना आम्ही सांगितलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात चार चक्रीवादळं आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई हा जो काही समुद्रकिनारा आहे या समुद्रकिनाऱ्याला काही गोष्टी अशा केल्या पाहिजेत की त्या पर्मनंट झाल्या पाहिजेत. उदाहरणार्थ अंडरग्राऊंड केबल, विद्युत वाहिनी ते टाकायला हवं, पक्के निवारे, किनारा संरक्षण भिंत उभे करणे अशा गोष्टी आहेत, या पायाभूत सुविधांसाठी ५ हजार कोटींची आवश्यकता आहे. आमचे म्हणणे कायम NDRF चे पैसे, काही राज्य सरकारचे पैसे हे कायमचं दुखणे दूर करण्यासाठी आम्ही आराखडा बनवला आहे. त्यासाठी ५ हजार कोटी रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्याचं अजित पवार म्हणाले.