ठाणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत असताना दुसरीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद उफाळून आला होता. ठाणे शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांसाठी केंद्राने निधी पाठवला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख कामाच्या ठिकाणी झालाच पाहिजे, असे ठणकावत भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी आज पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
ठाणे शहरात केंद्राने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे १२ विकासकामांसाठी निधी दिला आहे. त्यातील काही कामे झाली असून काही सुरू आहेत. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याबाबत ठाण्यातून भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप पुरी यांना भेटले होते.
तसेच कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी स्मार्टसिटी योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे तसेच ठामपा गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, कार्यकारी अभियंता प्रवीण फापळकर आदी उपस्थित होते.