ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं शक्तीप्रदर्शन, राऊतांना दिला इशारा !

 

रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद समोर आले आहे. उद्योगमंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) गैरहजर राहिले. पण, त्याच बैठकीला हजर राहत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी स्थानिक आमदार म्हणून रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यानंतर रिफायनरीसाठी चाचपणी सुरू असलेल्या गावांमध्ये राजन साळवी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेला. शिवाय त्यांच्या पोस्टरवर शेण देखील फेकले गेले. यानंतर जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशाचा भंग झाल्याच्या कारणास्तव रिफायनरी विरोधी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी राजापूर पोलीस ठाण्यासमोर आपल्या समर्थकांसह एकत्र येत या आंदोलकांविरोधात निवेदन देणार आहे. पण, यामध्ये मात्र एक सवाल विचारला जातोय. राजापूर पोलिस ठाण्यासमोर साळवींचं समर्थकांसह होणारं शक्तीप्रदर्शन म्हणजे विनायक राऊत यांना इशारा आहे का? कारण, रिफायनरीच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. पक्षाची भूमिका लोकांसोबत जाण्याची असली तरी साळवी मात्र विकास आणि रोजगाराच्या मुद्यावर रिफायनरीचं समर्थन करत आहेत. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटातील अंतर्गत वातावरण तापलं आहे.

राजापूर पोलीस ठाण्यासमोर शक्तीप्रदर्शन करत राजन साळवी पक्षातील विरोधकांना इशारा तर देत नाहीत ना? असा सवाल देखील आता विचारला जात आहे. विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे 2019 मध्ये राजापूर – लांजा इथल्या मतदारसंघातील उमेदवार अविनाश लाड यांची भेट घेत चर्चा केली होती. महाविकास आघाडीतील नेते म्हणून भेट झाल्याचं राऊत यांनी म्हटलं असलं तरी त्यामुळे राजन साळवी नाराज झाल्याचं मानलं जात आहे.

2024 मध्ये अविनाश लाड यांना काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आणून त्यांना राजापूर – लांजा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा प्लॅन आहे. त्यासाठी राऊत यांनी लाड यांची भेट घेतल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं. तर, राजन साळवी यांना रत्नागिरी – संगमेश्वर या मतदार संघातून उभं केलं जाऊ शकतं अशी देखील शक्यता आहे. परिणामी साळवी नाराज असल्याचं मानलं जात आहे.

Team Global News Marathi: