ठाकरे सरकारच्या या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली खंत !

जळगाव | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने कमी होताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व वारकरी संप्रदायांना आषाढी वारीचे वेध लागले आहे. मात्र राज्य सरकारने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. परंतु, मुक्ताबाई पालखी सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे.

मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते. हा पायी यात्रा सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत आहे. या पायी वारीमध्ये हजारो लोक सामील होत असतात. या पायी यात्रेमध्ये प्रत्येक गावांमध्ये मुक्काम असतो मुक्कामाच्या दरम्यान गावातील लोक मुक्ताबाईच्या पादुकांची पूजा करतात आणि पालखी सोहळा पुढे जात असतो ही परंपरा राहिली आहे.

मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मागच्या वर्षी आणि यंदाच्या वर्षी या परंपरेला छेद दिला गेला आहे. राज्य सरकारच्या वतीने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी दिली आहे‌. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी तहानलेला असतो, आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावं ही वारकऱ्यांची इच्छा असते. परंतु, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले आहेत. या प्रस्तावाचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते, अशी खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

Team Global News Marathi: