मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागच्या दोन दिवसांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांशी बोलत आहे. शनिवारी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर त्यांनी रविवारी टास्कफोर्स बरोबर बैठक आयोजित करून किती दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करायचा या संदर्भात चर्चा केली. मात्र आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा असा मार्ग राज्य सरकारला सुचवला आहे. चंद्रकांत पाटील हे पाहिल्यादिवसापासून लॉकडाऊन विरोधात भूमिका मांडताना दिसून आले होते.
पाटील म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. केवळ आठ दिवस किंवा पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनमुळे तो संपणार नाही आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण कमी होईल. पण तो समुळ नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासह प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविल्या पाहिजेत.
ते पुढे म्हणाले की, कोरोना चाचण्यांसंदर्भात लोक साशंक आहेत त्यामुळे बिनचूक टेस्टिंग किटसाठी पाठपुरावा केला पाहिजे. टाटाने अशा प्रकारचे टेस्टिंग किट उपलब्ध करुन दिले होते, मात्र ती कुठे गायब झाली, याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु करणे, ज्यांना तीव्र स्वरुपाची लक्षणे आहेत, त्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवणे, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सर्व रुग्णालयांना पुरवणे, त्याचप्रमाणे रुग्णालयांमध्येच ऑक्सिजन तयार होईल, अशी यंत्रणा कार्यन्वित करणे आदी उपाययोजना करण्याची गरज आहे असे त्यांनी राज्य सरकारला सुचविले आहे.