सुशील मोदी यांनी आता भारतीय जनता पक्षाचे खरे दात दाखवले आहेत. राज्यात जे घडलं ते भाजपने केलं आणि आता मोदी बोलले तेव्हा सत्य बाहेर आलं,” अशी टीका शिवसेनेचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. “धोका दिला म्हणून भाजपने शिवसेना फोडली,” असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी बिहारमध्ये केलं होतं. त्यावर अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपवर अनेक आरोप करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा धागा पकडत सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं होतं की, “आम्ही कोणताही मित्रपक्ष तोडत नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे. जसे महाराष्ट्र. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले.”
यावर सुशील कुमार मोदी यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी टीका करताना भाजपने खरे दात दाखवल्याचं म्हटलं. दानवे म्हणाले की, “राज्यात जे घडलं ते भाजपने केलं आणि आता मोदी बोलले तेव्हा सत्य बाहेर आलं. त्यांनी अनेक पक्षांसोबत त्यांनी असंच केलं. त्यामुळे राज्यातील उठाव नव्हता तर हा सगळा गद्दार लोकांचा प्लॅन होता. आता ईडीचे कार्यलय बिहारमध्ये शिफ्ट होईल.”