भाजप नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोन कॉलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविरोधातच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्यं केलं आहे.
या संदर्भात ट्विट करत चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने संघर्ष करणारे भाजपा नेते आशिष शेलार यांना अज्ञात माथेफिरुंनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचे समजले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आग्रह करतो की त्यांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत म्हणाले, भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी असे कितीही प्रयत्न करण्यात आले, तरीही अशा धमक्यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, जनतेच्या न्याय हक्कासाठी आमचा संघर्ष न थांबता सुरुच राहील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.