मुंबईकरांचे हाल थांबवा, लोकल सुरू करा – राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

 

मुंबई कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून सामान्य नागरिकांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करण्याची मागणी विविध स्थरातून होत होती. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकल सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन पानाचे पत्र लिहून ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत मागणी केली होती. आता राज ठाकरे यांनीही मागणी केली आहे.

राज ठाकरे यांचं पत्र

गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंघ आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंघ नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत. मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरु आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्‍य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत.

महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? ही साथ एकाएकी जाणार नाही असं जगातल्या तज्ञांचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे, आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात, लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बधांच्या पलिकडे काही सुचत नाही, महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत.

सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरु केली जावी. विविध प्रकारच्या मोहीमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील, आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल. मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्याचा विचार करून त्वरित पावलं उचलेल.

Team Global News Marathi: