अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार का ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

 

कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त मा. प्रदेशाध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सूख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आगामी काळातही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सवलत द्यावी, असे सांगितल्याचे एका पत्रकाराने निदर्शनाला आणून प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजितदादा पवार आणि राजेश टोपे यांच्याप्रमाणेच आपले मत आहे. आपण ते आधीपासूनच व्यक्त केले आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे असे नियम पाळून काम सुरू केले पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी व्यवहार खुले करावेत. जनजीवन बंद ठेऊन चालणार नाही, परिस्थितीला सामोरे जावे लागेलच. अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का ?राजकारणातील परखड माणूस अशा शब्दात गौरव करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Team Global News Marathi: