राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये सरकारने अचानक बदल केल्याने विद्यार्थी आणि पालक मात्र चांगलेच गोंधळून गेले आहेत. सुट्टीच्या दोन वेगवेगळ्या नोटीस समोर आल्याने राज्य सरकारचा गोंधळ पुन्हा जगजाहीर झाला आहे. या गोंधळामुळे ठाकरे सरकारवर चौफेर टीका होत असताना सुट्टीच्या दोन वेगवेगळ्या नोटीसीवरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे.
आता याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असताना सुट्टीच्या दोन वेगवेगळ्या नोटीसीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. शाळांना दिवाळीनिमीत्त १ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर सुट्ट्या असतील, असं परिपत्रक शालेय शिक्षण विभाग, पुणे यांनी काढलं होतं. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक नवं परिपत्रक ट्विट करत शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर सुट्ट्या असल्याचं जाहीर केलं.
या दोन-दोन सुट्ट्यांच्या वेळापत्रकामुळे पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले. हा मुद्दा लावून धरत भातखळकरांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्याला शिक्षण मंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे, अशी खोचक टीका अतुल भातखळकरांनी केली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शाळा दीड वर्षांपासून बंद होत्या. विद्यार्थ्यांना शाळा आणि शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षक पालक मोठी मेहनत घेत आहेत. पण सुट्ट्यांच्या या गोंधळामुळे विद्यार्थी पुन्हा गोंधळून गेले आहेत.