पुणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन ते पडण्याच्या नवनवीन तर्क विरोधकाकडून जाहिर करण्यात येत आहेत. तितकंच महाविकास आघाडीचे जनक आणिशिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा विरोधकांना चोख प्रतिउत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी पाच वर्षं पूर्ण करेल, पुढील तीन वर्षं मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच असतील आणि २०२४ नंतरही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. आता तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा बालही बाका करू शकणार नाही, असेही त्यांनी भाजपला सुनावले.
शिवसेना पुणे शहर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱयांची आढावा बैठक वडगाव शेरी येथे झाली. यावेळी खासदार संजय राऊत बोलत होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. पुण्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह चांगला आहे. आता पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता दहावर थांबायचं नाही. येत्या महापालिका निवडणुकीत असा आकडा लावायचा की, आपल्याशिवाय पुण्यात कुणाचाच महापौर होता कामा नये. त्यामुळे कुणी कितीही आपटा, पुण्यात सत्ता शिवसेनेचीच येणार अशी ग्वाही खासदार संजय राऊत यांनी दिली.
बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कपमुख आदित्य शिरोडकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, उपनेते शशिकांत सुतार, रघुनाथ कुचिक, माजी मंत्री विजय शिवतारे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, तृष्णा विश्वासराव, कीर्ती फाटक, पृथ्वीराज सुतार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.