राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाःका माजलेला आहे. यावरून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री गाडी चालवत विठ्ठल दर्शनासाठी गेले, पण चेंबूर आणि भांडूपला मृत पावलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला गेले नाहीत. राज्याला ड्रायव्हर नको आहे, महाराष्ट्र शासनाकडे हजारो ड्रायव्हर आहेत, राज्याला लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा, असं राणे म्हणाले.
राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, कोकणात अतिवृष्टी झाली, लोकांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांच्यासाठी तरतूद करुन ठेवायला हवी होती, याची माहिती नव्हती का? आजच पाऊस पडला का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. या टीकेला आता शिवसेना काय देते हे पाहावे लागणार आहे.