राज्यात पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या अनेक बाबींवर आता निर्णय घेण्यात येत असून लवकरच जुन्या झालेल्या आणि कोळसाधारीत प्रदूषणकारी विद्युत निर्मिती यंत्रणेमध्ये पद्धतशीरपणे कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कसा कमी करता येईल यासाठी सर्वंकष अभ्यास करण्याचं महाराष्ट्र सरकारनं ठरवले आहे, यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
नुकतेच बंद केलेल्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील नांदगाव फ्लाय अॅश पॉण्डला सोमवारी आदित्य यांंनी भेट दिली. “नांदगावमधली ग्रामस्थाकडून आलेल्या, विशेषत: महिलांकडून आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करुन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आम्ही ठरवले. पुढील पंधरा दिवसात नांदगाव अॅश पॉण्डची जागा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. नांदगाव तसेच वारेगाव येथील अॅश पॉण्ड कायमस्वरुपी बंद केले जातील,” असं ठाकरे म्हणाले.
राज्यातील सर्व विद्युतनिर्मिती केंद्रावर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उपाययोजना, हवा प्रदूषणासाठी एफजीडी उभारणीसहीत केल्या जातील असे त्यांनी नमूद केली. त्याची सुरुवात कोराडी आणि खापरखेडा येथून होईल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार फ्लाय अॅशचा १०० टक्के वापर केला जाईल याबाबत आम्ही आश्वस्त करत आहोत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्येदेखील फ्लाय अॅशचा वापर केला जाईल असेही ठाकरे म्हणाले.