रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भाजपचा खासदार निवडून येईल

 

कणकवली : कोकणातील अनेक प्रश्न केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणे व भाजपचे पदाधिकारी केंद्र सरकारकडे मांडत आहेत. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना तळमळीने मांडता हे पाहून समाधान वाटते. पक्षासाठी असलेली निष्ठा आणि आत्मिकेने सुरू असलेले काम पाहिल्यानंतर या मतदारसंघात लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येणार यात तीळ मात्र शंका नाही. असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय प्रवास मंत्री म्हणून गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. कणकवली येथे लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने देशभरात जेवढ्या योजना राबवल्या तेवढ्या योजना गेल्या ६७ वर्षात कोणतेही सरकार राबवू शकले नाही. सामान्य गृहिणी पासून शेतकऱ्यापर्यंत आणि बेरोजगारापासून नोकरदारा पर्यंत प्रत्येकाचा विचार करून मोदी सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार करता गेल्या अडीच वर्षात शिवसेना पक्षाने महाविकास आघाडी करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि त्यामुळे ते लोकाभिमुख सरकार चालू शकले नाहीत. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा जनतेला देऊ शकले नाहीत. आता महाराष्ट्र राज्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार आलेले आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा. असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी कणकवली येथे बोलताना केले.

केंद्र सरकारच्या योजनेतील जनतेला अपेक्षित असलेले बदल आणि कारणे जाणून घेतली. लाभार्थ्यापर्यंत ही योजना अजून व्यापक स्वरूपात पोहोचाव्यात म्हणून काय केले जावे ? याबाबतचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा बोलत होते.

२०१४ च्या पूर्वी देशात अनेक सरकारे होती.
मात्र सामान्य जनतेच्या गरजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्या. पीएम किसान योजना, घरकुल आवास योजना, उज्वला गॅस, अशा असंख्य योजना सांगता येतील ज्या देशात यशस्वीपणे चालू आहेत. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला मोफत धान्य देऊन आमच्या सरकारने मदतीचा हात दिला. अशा यशस्वी पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांची चर्चा कार्यकर्ते म्हणून जनतेपर्यंत न्या आणि नवनव्या योजना चे लाभ जनतेला मिळवून द्या असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अजय कुमार यांनी केले. यावेळी भाजपा आमदार नितेश राणे यांनी चर्चेदरम्यान पदाधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री मिश्रा यांच्यात समन्वय साधला.

Team Global News Marathi: