मुंबई |राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जयंत पाटील म्हणाले की,’सदरचा प्रकार हा निंदनीय असून हल्ला करणारे नेमके कोण होते, हे आंदोलक होते का? ज्यावेळी हे सर्वजण शरद पवार यांच्या घराजवळ गेले होते त्यावेळी त्यांची अवस्था बघून ते आंदोलक असल्याचं वाटले नाही.’ तसेच या सर्व प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याची टीका राजयंत पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे सदावर्ते यांनी पुन्हा एकदा महविकास आघाडीवर आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.