पश्चिम महाराष्ट्रानंतर खान्देशात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतीवृष्टीमुळे पूरपरीस्थिती निर्माण झाली होती. या पूराच्या पाण्यात अनेक गरीब नागरिकांचे संसार वाहून गेले. संसार वाहून गेलेल्या या नागरिकांची चूल पेटवण्यासाठी सिद्धीविनायकाच्या चरणी रिलायंन्स उद्योग समुहाने अर्पण केलेल्या गॅस शेगडी आता पूरग्रस्तांच्या संसाराचा गाडा चालवणार आहे.
गॅस शेगडीने भरलेले कंटेनर जळगाव आणि नांदगाव येथे पाठवण्यात आलेत. यापूर्वी असेच सहा गस शेगडीने भरलेले कंटेनर पूरग्रस्तं चिपळुण आणि महाड तहसीलदार कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीतून सिद्धीविनायक मंदिर न्यास नैसर्गिक आपत्तीग्रस्तं नागरिकांच्या डोक्यावर नेहमीच मदतीचं छत्र धरतं. यापुढेही कायम ही समाजसेवेची वात तेवत रहाणार असल्याचं मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.
यापूर्वी सुद्धा अनेकवेळा सिद्धिविनायक मंदिर न्यास महाराष्ट्रात उद्भवलेल्या संकटात सढळ हाताने मदत केली आहे. तिवरे धरणग्रस्त नागरिकांना पुन्हा घरी बांधून देण्यसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाने पुढाकार घेतला होता.