दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतलं. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. मलिकांच्या अटकेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विधानभवनाच्या पायरीवर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
‘दाऊद के दलालों को, जुते मारो सालों को’, ‘मुंबई के गद्दारों को, जुते मारो सालों को’, ‘नवाब मलिक कौन है, नवाब मलिक चोर है’, ‘मुंबई की गलियाँ सुनी है, ठाकरे सरकार खुनी है’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, नवाब मलिक राजीनामा द्या’, ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात येत होत्या.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील आमदार किंवा मंत्री पायऱ्यांवरून जात असताना भाजप आमदारांच्या घोषणा अधिकच वाढत होत्या. जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा भाजप आमदारांनी ठाकरे सरकारला दिला आहे.