गुरुपौर्णिमा निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशिर्वाद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ सुद्धा हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी फुलं वाहून बाळासाहेबांचे आशिर्वाद घेतले.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सगळे जण नतमस्तक होत असता. प्रत्येक शिवसैनिकांमध्ये वेगळी भावना असते. आज त्यांच्या आशिर्वादांमुळे माझ्यासारखा साधा शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. बाळासाहेबांनी जो काही विचार दिला आहे. तो विचार पुढे नेण्याचे काम मी आणि माझ्यासोबत असलेले 50 आमदार नेणार आहे, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला. ‘बाळासाहेबांनी शिवसैनिकांनी ताट मानेनं जगण्याची दिशा दिली. या राज्यात आमचे युती सरकार हे चांगले काम करेल.
राज्याचा विकास, शेतकऱ्यांचा विकास आणि गोर-गरिबांचा कल्याण करण्यासाठी आम्ही काम करणार आहे. बाळासाहेबांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहे’ असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘मी गेल्या अनेक वर्ष न चुकता हजारो शिवसैनिक ठेंभी नाक्यावर आनंद दिघे यांना अभिवादन करत असतात. मी सुद्धा तिथे चाललो आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.