कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदा शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारने काही निर्बंध लादले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे यावर संसर्गाचे सावट आले आहे. मागील काही दिवसांत कोरोनाची दहशत काहीशी कमी झाली होती, याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरवले होते..
पण, बुधवारी राज्यात काल पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. दरम्यान, शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे.
राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल राम कदमांनी पत्रातून केला आहे.