शिवसेना पुन्हा एकदा आपल्या दिल्या शब्दाला जागली.

 

ठाणे | रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे ( वय 14) हिला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर देऊन शिवसेनेने आपला शब्द पाळला आहे. आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते तिला नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेन मध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती.

यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासोबतच शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

मूळच्या मानपाडा येथे राहणाऱ्या रुणाली कडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

रुणाली हिच्यावर नियतीने घाला घातला असला तरीही तीला पुन्हा तिच्या पायवर उभे करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील शिवसेनेने उचलला होता. आता तिला हक्काच घरकुल देऊन तिच्यासमोरील निवाऱ्याचा प्रश्नही निकाली काढला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने तिला ठाण्यात घरकुल उपलब्ध करून देऊन शिवसेनेने आपला दिलेला शब्द पाळला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Team Global News Marathi: