शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीवर समनातून घणाघाती टीका

 

आज पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावर सामनाच्या संपादकीयमधून पाळणा हलला दोऱ्या कोणाकडे म्हणत भाष्य करण्यात आले आहे.’किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला.मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली.श्री. फडणवीस यांच्या तर दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत. आणि हेच पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे. ही महाराष्ट्राची बदनामीच आहे. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे.विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.क्रांती दिनाचा मुहुर्त शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेईमानी, विश्वासघातालाच क्रांती म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्य़ात.

सामनाच्या संपादकीयमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? माहीत नाही. अखेर 40 दिवसांनंतर शिंदे फडणवीस सरकारचे बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले. पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही.मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता,फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. राज्यपाल महोदयांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपत दिली व आत्ता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे.सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना त्यातील काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणे हा लोकशाही व घटनेचा खून आहे. पण असे खुनी सध्या देशभरात मोकाट सोडून त्यांच्या माध्यमातून राज्य चालवले जात असल्याचा’ घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.

 

12 ऑगस्टला जजमेंट डे आहे, म्हणजे निकाल येईल व त्याआधी हा शपथविधी संपन्न होत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भीती नाही.
सर्वकाही मनाप्रमाणे होईल,असा आत्मविश्वास फसफसून बाहेर पडला आहे.तो कशाच्या जोरावर ? 18 मंत्र्यांनी शपथ घेऊन त्यांचे घोडे गंगेत न्हाले, पण गंगेत डुबकी मारून तरी यांच्या विश्वासघाताचे पाप धुतले जाईल काय ? यातले अनेक जण ईडीच्या भयाने कातडी वाचविण्यासाठी बेईमान झाले असे म्हंटले आहे.

Team Global News Marathi: