राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नसताना अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीवर पडणारा बोजा, आमदारांना खूश करण्यासाठी होणारी निधीची खैरात, या पार्श्वभूमीवर सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. विरोधक विविध मुद्द्यांवरुन शिंदे- फडणवीस सरकारची पळता भुई थोडी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामनामधून शिंदे सरकारवर आसुड उगारला आहे. एक बोचरी टीका करत शिवसेनेनं शिंदेंना डिवचलं आहे. ‘एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रिपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकर्त्याने बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे दिसेल,’ असा इशारा देत शिवसेनेनं हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसत आहे.