शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून, उरलेल्या मंत्रिपदांचे ५०-५० टक्के वाटप होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’वर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे नऊ आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी इच्छुकांना दिला होता.
मात्र, ऑक्टोबर महिना संपला तरी हा विस्तार झाला नाही. आता हा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच बच्चू कडू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, कडू यांची ही नाराजी येत्या दोन दिवसात दूर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी अयोध्येचा दौरा केला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जात होते. याबाबत विचारले असता, लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.