मुंबई | शिंदे गटाच्या त्या १५ महाराष्ट्रद्रोही आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. काय तर म्हणे, गुवाहाटीतील काही गद्दारांच्या महाराष्ट्रातील कार्यालयांची तोडफोड झाली. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेचा गहन वगैरे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो म्हणून केंद्र सरकारने त्यातील १५ जणांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र आमदारांना सुरक्षा देण्याच्या निर्णयावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
हा राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये सरळ सरळ हस्तक्षेप असून या १५ आमदारांचा ‘नाच्या’ म्हणून उल्लेख आजच्या सामना अग्रलेखातून शविसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामध्ये बंडखोर एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.या आमदारांना मुंबई-महाराष्ट्रात येण्याची भीती वाटते की, हे आपल्या कैदेतील आमदार मुंबईत उतरताच पुन्हा ‘उड्या’ मारून स्वगृही पळतील, अशी चिंता वाटल्याने त्यांना सरकारी (केंद्रीय) सुरक्षा यंत्रणेचे बंदी केले? हाच प्रश्न आहे.
एक मात्र नक्की की, महाराष्ट्राच्या राजकीय वगनाट्यात केंद्राचे डफली, तुणतुणेवाले उतरले असून राज्यातील ‘नाचे’ आमदार त्यांच्या तालावर नाचत आहेत. ही सर्व ‘नाचे’ मंडळी तिकडे गुवाहाटीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या महाराष्ट्रद्रोहाचे प्रदर्शन संपूर्ण देशाला आणि जगाला करीत आहेत. आता या ‘वग’नाट्याचे सूत्रधार आणि दिग्दर्शक नेमके कोण आहेत, हे उघड झालेच आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.