स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या धसक्यानं राज्याच्या कृषी विभागाने पीकविमा कंपन्यांना( पीकविमा रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळं विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. परंतू काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करुन फसवणूक केली जात असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली तर याद राखा, तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही असा इशारा तुपकरांनी पीकविमा कंपन्यांना दिला आहे.
राज्यात 40 लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा 2 हजार 148 कोटी रुपये पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी कंपन्यांनी 942 कोटी रुपये जमा केले आहेत. कंपन्यांकडे 1 हजार 205 कोटी रुपये अद्याप बाकी आहे. तसेच पोस्ट हार्वेस्टिंगचा पीकविमा अजून बाकी आहे. परंतू काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करून फसवणूक केली असल्याचे तुपकर म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील AIC कंपनीनं शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. त्यामुळं स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी या कंपन्यांना इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले आहेत, त्या शेतकऱ्यांची जर कंपनीने तत्काळ 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही, तर AIC कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही असा इशारा तुपकरांनी दिला आहे. तसेच बाकी कंपन्यांचेही कार्यालयात उध्वस्त करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.