मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राज्य महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता यावर चर्चा केली.त्याचवेळी त्या म्हणाल्या की, “शरद पवार आहेत म्हणून महाविकास आघाडीचे सरकार जोरात सुरू आहे.”
त्यासह त्या पुढे म्हणाल्या की, “महाविकास आघाडी काळात अजून महिला धोरणं आणखी प्रो ॲक्टीव करू शकतो. महिला धोरणांची अंमलबजावणी झाली पाहिजे. रस्त्यावर प्रत्येक २५ किमीवर टॉयलेट हवेत. हे कर्नाटकमध्ये आहे तर आपल्या इथे का नाही.”पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “महिला धोरणांना आपण महत्त्व देत नाहीत, त्यांना महत्त्व दिलं पाहीजे. कोस्टल रोड झाली नाही, तरी चालेल पण मुलांसाठी, महिलांसाठी पैसे दिले पाहिजेत, यासाठी मी भांडते,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर, संजय पांडे, ज्योती ठाकरे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.