पूरग्रस्त भागात राजकीय नेत्यांनी दौरे न करण्याचा शरद पवारांनी दिला सल्ला

 

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दोनच दिवसांपूर्वी कोकण भागाचा दौरा केला होता. मात्र आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षांना दौरा न करण्याचा सल्ला राजकीय नेत्यांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार म्हणाले, “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”, असं पवार म्हणाले.

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं असं पवार यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: