अभिनेते शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडल्यामुळे त्यांचे फॅन्स खूप निराश झाले आहेत. त्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांनी लोढा यांना परत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहतांच्या कथांशिवाय निर्मात्यांना मालिकेची ओळख टिकवणं कठीण जात आहे.
‘ई टाइम्स’च्या टीव्ही रिपोर्टनुसार, निर्माते असित मोदींनी शैलेश लोढा यांना शोमध्ये आणण्यासाठी अनेक वेळा संपर्क केला आहे; पण लोढा माघार घेण्यासाठी तयार नाहीत. इतकंच काय तर मालिकेतील अनेक कलाकारही त्याच्यापर्यंत पोहोचून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनाही अद्याप यश आलेलं नाही.
काय आहे अडचण? शैलेश लोढा यांनी बऱ्याच दिवसांपासून चित्रीकरण थांबवलं आहे. पण, त्या मागचं कारण समोर आलेलं नव्हतं. लोढा यांनी मालिका का सोडली याबाबत अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. मालिकेतील प्रमुख पात्र जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांच्यातील संबंध चांगले नसल्याची चर्चा आहे.
मागच्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रसारित होत असूनही शैलेश यांना समाधानकारक महत्त्व मिळत नसल्यामुळे ते नाखूश असल्याचा दावाही केला जात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील अनेक कलाकारांनी शैलेश यांच्याविरोधात गटबाजी केली आहे, असंही सांगितलं जात आहे. शैलेश पुन्हा येणार! आपण शैलेश लोढा यांचं मन वळवू अशी असित मोदी यांना आशा आहे. परंतु, लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की, यापूर्वी दिशा वकानी, गुरचरण सिंग आणि नेहा मेहता यांना शोमध्ये परत आणण्यात मोदींना यश आलं नव्हतं.