नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नारायण राणे यांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.पण अशात घडलेल्या काही राजकीय घटना बघता नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नारायण राणेंच्या सुरक्षेसाठी आता दोन ऐवजी आठ सीआयएसएफ जवान असणार आहेत.
नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या सुरक्षेचा आढावा घेत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृत महोत्सवाऐवजी हिरक महोत्सव असा उल्लेख केला होता. या प्रकारावरून नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण चांगलच तापलं होत. या घटनेनंतर राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानानंतर ठाकरे सरकारने राणेंविरोधात अटकेची कारवाई केली. या अटकेनंतर केंद्र सरकारने नारायण राणे यांच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यानूसार केंद्राने नारायण राणे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे.