शाळा, कॉलेज शंभर टक्के जाचक फीवसुलीचा भार हलका होणार! राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला जयंत पाटील यांचे आश्वासन

कोरोना संकटात बेरोजगारी आणि आर्थिक बाजू अस्थिर झाल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज आभासी शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शंभर टक्के शिक्षण शुल्क फी वसुली करत आहेत. ही जाचक फी वसुली ५० टक्के कमी करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीपासून लावून धरली आहे. याप्रश्नी आज राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

या भेटीत राज्य सरकारने शाळा कॉलेज अगदी केजी ते पीजी स्तरावर शिक्षण शुल्क ५० टक्के कमी करावे, कोरोना संकटात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा, अशी आग्रही मागणी जयंत पाटील यांची भेट घेऊन केली. जयंत पाटील यांनी याप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शाळा, कॉलेजचे शिक्षण शुल्क ५० टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच याप्रश्नी तोडगा न निघाल्यास मंत्रालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे मुंबई अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ऍड अमोल मातेले यांनी दिला. यावर जर हा प्रश्न सुटला नाहीतर मी देखील आपल्यासोबत आंदोलनात उतरेन, असा शब्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे, अशी माहिती ऍड अमोल मातेले यांनी दिली.

Team Global News Marathi: