काँग्रेसस नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी धिक वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चाही काढला होता. या मोर्चामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के सुद्धा सामील झाले होते.
पोलिसांनी राहूल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही आज मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.