स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापेक्षा टिपू सुलतान ग्रेट होते असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. टिपू सुलतान यांनी इंग्रजांशी चार वेळा लढाई केली होती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चार वेळा इंग्रजांची माफी मागितली होती असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे.
एका जाहीर सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी हे विधान केले आहे. ‘इंग्रजांविरुद्द चार युद्धे करणाऱया टिपू सुलतान यांच्याविरुध्द खोटी माहिती पसरवून त्यांच्याबद्दल समाजात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. टिपू सुलतान हिंदूविरोधी होते असे म्हणत आहेत. पण टिपू सुलतान हे ब्रिटिशांची गुलामी स्वीकारणारे मुस्लिम आणि इंग्रजांशी हातमिळवणी करणारे मराठा यांच्याविरोधातही होते.
तसेच इंग्रजांविरोधात लढण्यास नकार देणाऱया कर्नाटकच्या नवाबालाही त्यांनी विरोध केला होता.’ असे ओवैसी म्हणाले. टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढला तर दुसरीकडे सावरकर यांनी इंग्रजांना चार वेळा माफीचे पत्र लिहिले असे ओवैसी म्हणाले. आता ओवेसी यांनी सावरकर यांच्या संदर्भात विधान करून नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे. यावर आता भाजपा आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.