सौदी अरेबियाच्या एका निर्णयानं आशियाई देशांबरोबर भारताला बसला मोठा झटका!

 

नवी दिल्ली |सौदी अरेबियानं आशियाई खरेदीदार देशांसाठी तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ केली आहे.जुलै महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ उन्हाळ्यात तेलाची जास्त मागणी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो.

जुलैमध्ये आशियाई देशांसाठी अरब लाइट क्रूड ऑइलची अधिकृत विक्री किंमत जूनच्या तुलनेत प्रति बॅरल २.१ डॉलरनं वाढली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार ही वाढ अपेक्षेपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांनी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास प्रतिबॅरल १.५ डॉलरच्या वाढीचा अंदाज वर्तवला होता. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात सहापैकी फक्त एकानं कच्च्या तेलाच्या किमतीत प्रतिबॅरल २ डॉलरपर्यंतची उडी मारण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

“कच्च्या तेलाच्या किमतीत इतकी वाढ होईल असा अंदाज नव्हता. विशेषत: अरब लाइट क्रूडच्या किमतीत अशी वाढ होईल याचा विचार केला नव्हता. आम्ही या निर्णयानं खरंच चिंतेत आहोत”, असं आशियातील एका ऑइल ट्रेडरनं म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सौदी अरामकोनं ही वाढ केली आहे.
जुलैमध्ये तेलाचे उत्पादन ६,४८,००० बॅरल प्रतिदिन वाढवण्याचा OPEC+ देशांमधील करार असूनही हा निर्णय घेण्यात आला आहे. रशिया, अंगोला आणि नायजेरिया सारख्या ओपेक प्लस सदस्य देशांना तेल उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करणे कठीण जात आहे.

Team Global News Marathi: