राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदींसंबंधात सूचक विधान केले होते आता भागवतांच्या या वक्तव्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उदयपूर येथील चिंतन शिबिरात केलेल्या वक्तव्याचे समर्थनच सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे असे नाना पटोले म्हणाले.
अमरावती येथे एका कार्यक्रमासाठी आलेले नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गांधी परिवाराची देशाशी असलेली बांधिलकी, त्यागाची भूमिका जनतेला माहिती आहे. देशात वाढत असलेल्या धर्मांधतेबद्दल सोनिया गांधी यांनी उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात चिंता व्यक्त केली होती. देशात धर्माधर्मात भिंती उभ्या केल्या जात असून हे अत्यंत धोकादायक असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही नेमकी हीच भूमिका मांडली असून ती स्वागतार्ह असल्याचे नाना पटोले म्हणाले.
सद्यस्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्दय़ावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी अतिवादीपणा टाळला पाहिजे. मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता? इस्लामी राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेली अनेक मंदिरे तोडली. हिंदूंना वाटते की आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत. ज्ञानवापीच्या मुद्दय़ावर चर्चेतून मार्ग काढायला हवा.