नवी दिल्ली | विवाहित महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि विवाहितेमध्ये अनैतिक संबंध होते. आता ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तरुणानेच महिलेची हत्या केली होती. आरोपी आणि मृत महिला दोघेही विवाहित होते आणि त्यांच्यात अनैतिक संबंध होते.
पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, आरोपीचे नाव भरत असे असून तो सागरपूरचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने ड्रायव्हर असून त्याला दोन मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की त्यांना 22 एप्रिल रोजी नैऋत्य दिल्लीतील सागरपूर येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळाली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरती देवी (२८) असे मृत महिलेचे नाव असून ती सागरपूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला जखमी अवस्थेत दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
नैऋत्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) मनोज सी यांनी सांगितले की, महिलेच्या पतीच्या वक्तव्याच्या आधारे सागरपूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराने आरोप केला होता की, भरत नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केले.
डीसीपी म्हणाले की, तांत्रिक पाळत ठेवून, स्थानिक गुप्तचर आणि आमच्या टीमच्या समन्वयित प्रयत्नांच्या मदतीने भरतला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. भरतने चौकशीदरम्यान खुलासा केला की, त्याचे आरतीशी अनैतिक संबंध होते आणि ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, म्हणून त्याने तिच्यावर वार केले.