राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचयव्हर अनके गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले असून त्यांच्या जात प्रमाणपत्र, पहिले लग्न तसेच त्यांच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप लगावले आहे. तसेच दररोज पत्रकार परिषद आणि ट्विटच्या माध्यमातून नवाब मलिक वानखेडे यांच्यावर अनेक आरोप लागवताना दिसून येत आहे.
अशावेळी समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब एकाकी पडल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून राज्यातील भाजप नेत्यांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती खात्रीदायक सूत्राच्या मध्यातून मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार असलेल्या राज्यात समीर वानखेडे यांना एकाकी पडू देऊ नका, असा आदेशच दिल्लीतील भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याचं कळतं आहे.
त्याबाबत पुढची रणनीती ठरवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या घरी बैठका सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तसंच भाजपचे अनेक नेते सध्या वरळीत एक ठिकाणी असल्याचं कळतंय. पडद्यामागे राहून वानखेडेंना हवी ती मदत करा, सहकार्य देण्याची भूमिका घ्या, असा आदेश दिल्लीतील भाजप नेत्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुंबईत दाखल झाल्याचंही समजतं आहे.