गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याच मुद्यावरून सामनाच्या रोकठोकमधून भाजपवर निशाणा साधला आहे. संभाजीनगरमध्येही नामांतरावरून दंगली व्हाव्यात व त्या आगीवर राजकीय भाकऱ्या शेकाव्यात अशी कुणाची इच्छा दिसते?, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सामनाच्या रोकठोक अग्रलेखात राऊत म्हणाले की, नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा जिल्हय़ाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडक कोनासीमा जिल्हा असे नाव केले. त्यांनतर या संपूर्ण भागात हिंसाचार व जाळपोळ सुरू आहे. एखाद्या शहराचे नामांतर करण्याचे अधिकार केंद्राचे असतात. प्रस्ताव केंद्राकडे जातो.
आज त्यानुसार कोनासीमा जिल्हय़ाचे नामांतर डॉ. आंबेडकरांच्या नावे झाले. मग विरोध का? औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी जुनीच आहे. त्यावर केंद्र सरकार का निर्णय घेत नाही? की संभाजीनगरमध्येही नामांतरावरून दंगली व्हाव्यात व त्या आगीवर राजकीय भाकऱया शेकाव्यात अशी कुणाची इच्छा दिसते? असं राऊत म्हणाले.
तर यावेळी राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने उकरून काढला आहे. बाबरीप्रमाणे औरंगजेबाची कबर हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा ठरत असेल तर भाजपने कुदळ-फावडी घेऊन त्या कबरीची बाबरी करण्याचे धाडस दाखवावे, पण सत्य असे की, औरंगजेबाची कबर भारत सरकारच्याच पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येते व आता ही कबर पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला आहे. यावर भाजप मंडळाचे काय म्हणणे आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.