राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील निवासस्थानी स्वागत केले.
माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वी सुद्धा मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे,संतोष सोनुले यांनीही प्रवेश केला आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचे होमग्राउंड आहे. राजे गटात प्रवेश केल्यानंतर रमेश माळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 21 वर्षांनी राजे साहेबांच्या घरी परतलो असल्याचे ते म्हणाले. मला भाजपमध्ये प्रवेश करताना कोणताही वाटला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुश्रीफ गटावर आरोप केला. मला कधीही मुश्रीफ गटात स्वातंत्र्य मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.