मुंबई | अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून जमा करण्यात आलेल्या निधीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आपचे खासदार सिंह यांनी केला होता. तसेच आम आदमी पक्ष व समाजवादी पक्षानं ईडी आणि सीबीआयमार्फत या अयोध्या जमीन घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या आरोपांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळत भजरतीया जनता पक्षावर टीका केली होती.
‘राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले आहे. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
यानंतर यावर आता एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता. त्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी त्यांना टोला लगावला आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी असं बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये. लायकीत राहावे अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.