कोल्हापूर | राज्यात राणा दाम्पत्य विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामना रंगलेला असताना दुसरीकडे राणा दाम्पत्यांच्या मातोश्री येथे हनुमान चालीसा पठाणांच्या कार्यक्रमावरून राजकारण तापले आहे अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावत गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिला आहे. राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्यजयंत पाटील यांनी केले.
निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच बाजू बदलली आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नसल्याचे पाटील म्हणाले. मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ल्याच्या संदर्भात देखील जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पाटील म्हणाले की, कोणाच्याही गाडीवर असा हल्ला करणे योग्य नाही. तो हल्ला कोणी केला, याबाबत तपास करणे गरजेचे असून सिग्नलला गाडी उभी राहिल्यावर हल्ला करणे, त्यानंतर ती गाडी निघून जाणे हे सगळ जरा व्यवस्थित तपासले पाहिजे असे पाटील म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेची आज कोल्हापूरमध्ये संकल्प सभा होणार आहे. यासंदर्भात पाटील यांना विचारण्यात आले त्यावेळी पाटील म्हणाले की, पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही परिसंवाद यात्रा काढली होती.ही यात्रा १४ हजार किलोमीटरचा प्रवास करुन आज कोल्हापूरमध्ये पोहोचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूरमध्ये संकल्प सभा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेकांना पवार साहेबांवर बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे ते बोलत असतात असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला.