राज्याचे गृहमंत्री सांगताहेत की, राज्यात कायदा सुव्यस्था बिघडली आहे. मग तुम्ही काय चपात्या भाजताय ? जमत नसेल तर राजीनामा द्या, शिवसेना बसलीच आहे आपला गृहमंत्री बसवायला. स्वतः काम करायचंच नाही आणि जे काही होईल त्याचं खापर कधी मनसेवर कधी आमच्यावर फोडायचं, असा या सरकारचा कारभार आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुढे पाटील म्हणाले की, राणा दाम्पत्याची मागणी शिवसेनेला मान्य नाही. त्यांना हनुमान चालिसा वाचायची आहे, राक्षसस्तोत्र नाही. ठीक आहे, त्यांना हनुमान चालिसाही वाचू द्यायची नाही, तर पोलिसांद्वारे रोखा. शिवसैनिकांनी रस्त्यावर का यावं? कारवाईत पोलिस कमी पडताहेत का? की सरकारला राज्य चालवता येत नाहीये?
परकीय आक्रमकांची निशाण तोडणारे शिवसैनिकांचे हात आता स्वकीयांवरच हल्ले करताहेत! अरेरे… किती ही अधोगती!! यांना सैनिक कसं म्हणायचं? सैनिक रयतेचं रक्षण करण्यासाठी असतो. मग जनतेवरच हात उचलणाऱ्या सैनिकांना जरब बसेल अशी कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदा-सुव्यवस्था राखणार का? असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थिती केला होता.
कोल्हापूर निवडणुकीतील दडपशाही, आता मातोश्रीसमोर हनुमान चालिसा प्रकरणावरून मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा कडेलोट झाल्याचे पुरावेच. विरोधात बोलायचं नाही, आम्ही करू तेच बरोबर असा मविआचा कारभार चाललाय. पण ही दडपशाही सहन करणार नाही असे सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितले होते.